पतीच्या निधनानंतर अवघ्या सात तासात पत्नीचे निधन...
पतीच्या निधनानंतर अवघ्या सात तासात पत्नीचे निधन.. ६५ वर्षाच्या संसारानंतर पती-पत्नी ने घेतला एकत्रित जगाचा निरोप : बरबडा येथील घटना..
आधुनिक केसरी न्यूज
तानाजी शेळगांवकर
नायगाव : लग्नात अनेक जोडपे आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याची शपथ घेतात.त्यांचं प्रेम,जिव्हाळ्याचं नातं हे सात जन्माच असतं.आयुष्यभर एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या पती-पत्नीच्या नात्याची तुलना कोणीही करू शकत नाही.परंतु फार कमी जोडपे हे शेवटपर्यंत साथ देण्याची शपथ निभावतात.नेमकी याच संदर्भात एक घटना घडली असून,पतीच्या निधनानंतर अवघ्या काही तासाच्या फरकाने पत्नीने देखील आपला जीव सोडल्याची ही घटना नायगाव तालुका असलेल्या बरबडा येथे घडली.आयुष्याची 65 वर्ष आपल्या सुखाच्या संसारात घातल्यावर एका वृद्ध दांपत्याने शेवटी देखील "सात जियेंगे साथ मरेंगेची" शपथ निभावत आपली साथ सोडली नाही.पतीच्या निधनानंतर अवघ्या सात तासांमध्ये पत्नीने देखील आपला जीव सोडला.या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून,दोघांच्याही पार्थिवावर मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.गंगाराम मल्लू नागधरे (वय 85 वर्षे) आणि महादाबाई गंगाराम नागधरे (वय 82 वर्षे) अस निधन झालेल्या पती-पत्नीचे नावं आहे.
गावातील गंगाराम नागधरे व महादाबाई नागधरे यांनी लग्नानंतर आयुष्याचे ६५ वर्षे सोबत घातले.पोटाला चिमटा देऊन आयुष्यभर त्यांनी काबाडकष्ट केलं. आनंदात संसार केला.या संसाररूपी वेलीवर त्यांना दोन मुलं चार मुली अशी अपत्य झाली. त्यानंतर नातवंड देखील झाली.वयानुरूप गंगाराम आणि महादाबाई यां दोघांचंही शरीर थकल्याने ते काही दिवसापासून अंथरुणात होते.दरम्यान गंगाराम हे काही दिवसापासून अल्पशा आजारी असल्याने सोमवारी रात्री 10 वाजता त्यांच निधन होताच त्यांची पत्नी महादाबाई यांनी देखील मंगळवारी पहाटे 5 वाजता म्हणजे अवघ्या सात तासात "सात फेऱ्यातून" घेतलेली शपथ निभावत या जगाचा निरोप घेतला.आयुष्याची ६५ वर्षे प्रपंचात त्यांनी उन पावसाला तोंड देत आपला संसार फुलविला होता. उभी हयात एकमेकाच्या सहवासात घालवल्यानंतर पती गंगाराम यांच्या पश्चात केवळ सात तासामध्ये महादाबाई यांनी सुद्धा जगाचा निरोप घेतल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
आयुष्यभर एकेमकांची साथ सोडली नाही...
गंगाराम नागधरे आणि महादाबाई नागधरे यांनी ६५ वर्षांपूर्वी लग्नाच्या वेळी एकेमकांना साथ देण्याचं दिलेलं वचन शेवटच्या श्वासापर्यंत पाळल. या ६५ वर्षांच्या काळात त्यांच्यावर अनेक संकटे आली पण त्यांच्या संसाराची गाठ शेवटच्या श्वासापर्यंत नियतीही तोडू शकली नाही. प्रत्येक सुखदुःखात दोघांनी एकमेकांना साथ दिली. प्रत्येक अडचणीचा मिळून सामना केला. मोठ्या कष्टाने लेकरांना मोठं करत त्यांच्या पायावर उभं केलं. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली,नातू, पणतू असा परिवार असून,थोरला मुलगा केंद्रीय पोलीस दलातून सेवानिवृत्त आहे.दोन्ही मुले आता शेती सांभाळत आहेत.
Comment List