भाजपला गळती ; शरद पवार गटात इनकमिंग वाढली !

भाजपला गळती ; शरद पवार गटात इनकमिंग वाढली !

आधुनिक केसरी न्यूज 

मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात भाापला गळती लागली असून शरद पवार गटात इनकमिंग वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबईतील पक्ष कार्यालयात पक्षप्रवेश झाला आहे.

पक्षप्रवेशावेळी मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले की,  सूर्यकांताताई पाटील यांनी मध्यल्या काळात त्यांनी वेगळा निर्णय घेतला होता. पण त्या कुठेही गेल्या तरी त्यांच्या मनात केवळ राष्ट्रवादीत आहे. त्यांचं राजकारण विचारांवर आधारित होतं. त्यामुळे त्या पुन्हा येतील हा विश्वास होता, अतिशय योग्य वेळी त्यांनी आता निर्णय घेतला आहे. सामाजिक ऐक्य टिकवण्याचे आपल्यासमोर आव्हान आहे. मराठवाड्यात आपल्याला जे चित्र बघायचं त्यात त्यांचा हातभार लागेल, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.

शरद पवार म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री सर्वपक्षीय लोकांची बैठक बोलाविण्याच्या विचारात आहेत. ज्याअर्थी त्यांनी पुढाकार घेतला आहे, त्याअर्थी आम्ही कुणीही या विषयात राजकारण आणण्याचा प्रश्न येत नाही. याच्यातून सामंजस्यातून पर्याय काढण्याच्या प्रयत्न करत असेल तर आमची सरकारला साथ राहिल. सामाजिक ऐक्याच्या संबंधी तडजोड नाही. ओबीसी किंवा मराठा घटक असो किंवा अन्य घटक असो त्यांच्यात एकप्रकारची दुही असणे ही राज्याच्या दृष्टीने योग्य नाही. तसंच, काहीही करायचं, पण आमच्यात एकवाक्यता राहिली पाहिजे असेही शरद पवार साहेब म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले की, आज सुर्यकांताताई पाटील हे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. सुर्यकांताताई यांचा आजचा पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात करायचा होता. परंतु पवार साहेबांना अधिवेशनाकरिता दिल्लीला जाणार आहे. म्हणून हा छोटेखाणी पक्षप्रवेश कार्यक्रम करण्यात आला आहे. सूर्यकांताताई आम्ही लहान होतो तेव्हा पासून काम करत होते. त्यांचे वडील हे स्वातंत्र्य सैनिक होते. सूर्यकांताताई हे निर्भीड पणे मत मांडणारे आहेत. पण मागच्या दीड वर्षा पासून आमचा त्यांच्याशी संवाद सुरु आहे. अनेक मंडळी पवार साहेबांना भेटत आहे. त्यांच्यावर तरुणांचा सगळ्यांचा विश्वास आहे. अनेक भागातले तरुण आणि मंडळी पवार साहेबांसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करत आहे. सूर्यकांता ताई यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमध्ये मी ताईंचे स्वागत करतो. असे जयंत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर बोलताना सूर्यकांताताई पाटील म्हणाल्या की, भाजपात जाऊन मी घोडचूक केली. मी भाजपात गेले तरी तिथं काहीच काम केलं नाही. मी रागामुळे राष्ट्रवादीतून बाहेर पडले होते. मात्र भाजपात जाऊनही दहा वर्षात मी तिथं काहीच केलं नाही. फक्त घरात बसून होते. कधीही कुणाला मत देण्याचं आवाहनही मी केलं नाही. पक्ष सोडतेवेळी शरद पवार साहेब मला म्हणाले होते की त्यांची विचारसरणी वेगळी आहे तिथं जाऊन तू काय करणार? अशी आठवण सूर्यकांताताई पाटील यांनी यावेळी सांगितली.

सूर्यकांताताई पाटील पुढे म्हणाल्या, साहेब आता तुम्ही फक्त आदेश द्या. तु्म्ही म्हणाल ते काम करायला मी तयार आहे. याआधी मीच रागात पक्षाला सोडंल होतं. दहा वर्ष भाकऱ्या भाजल्या. नातवंडांना मोठं केलं. शेती केली. पण आता मला काम करण्याची संधी द्या. १९९९ मधील सूर्यकांता समजून माझ्यावर जबाबदारी टाका. मी भाजपात जाऊन घोडचूक केली. पक्ष सोडताना साहेब मला म्हणाले होते की तिथं जाऊन काय करणार. पण त्यावेळी मी काही त्यांचं ऐकलं नाही. माझी दहा वर्षे वाया गेली तिथं मला काहीच करता आलं नाही, अशी खंत सूर्यकांताताई पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List