बारुळ मानारचे पाणी उदगीर-जळकोटला घेऊन जाणाऱ्या पाईपलाईन योजनेचे काम शिवसेनेने पाडले बंद

बारुळ मानारचे पाणी उदगीर-जळकोटला घेऊन जाणाऱ्या पाईपलाईन योजनेचे काम शिवसेनेने पाडले बंद

 आधुनिक केसरी न्यूज

धोंडीबा मुंडे
    
 कंधार  : राष्ट्रीय महामार्ग विभागाची परवानगी न घेताच उदगीर व जळकोट तालुक्यातील १३८ गावांना पाणी नेणाऱ्या योजनेच्या कामाला दि.२२ जून रोज शनिवारी दुपारी शिवसेनेने पाईपलाईनचे काम  बंद पाडले आहे.परवानगी घ्या नंतरच काम सुरू करा,अशी तंबी देऊन काम सुरू केल्यास शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी कंपनीच्या अभियंत्याला देण्यात आला.
         कंधार तालुक्यातील बारुळ मानार प्रकल्पातून उदगीर आणि जळकोट तालुक्यातील १३८ गावांना पाणी नेण्याचा घाट गेल्या वर्षी शासनाकडून घालण्यात आला.योजनेचे कामही सुरू झाले.पाईप रस्त्यांच्या दोन्ही बाजूस टाकण्यात आले.या योजनेला कंधार मधून मोठ्याप्रमाणात विरोध झाला. उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनेही तालुक्यातील पाणी पळविण्याला विरोध करून काम बंद पाडले होते. विशेष म्हणजे आमदार आणि खासदारांनी याबाबत मौन पाळल्याने हे पाप नेमके कोणाचे? त्याबाबत शंकाही व्यक्त केल्या गेल्या होत्या. 
        लोकसभा निवडणूक लागल्याने योजनेचे काम बंद होते. निवडणूक संपताच कामाला सुरुवात करण्यात आली असल्याने दि.२२ रोजी शनिवारी दुपारी ३ वाजता
यावेळी शिवसेनेचे (ऊबाठा) तालुका प्रमुख परमेश्वर जाधव, तालुका संघटक पंडित देवकांबळे, किसान सेना प्रमुख शिवाजी कदम व शिवसैनिकांनी हरबळ येथे सुरू असलेल्या कामावर प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित कंपनीच्या अभियंत्याला कामासंदर्भात जाब विचारला.
          राष्ट्रीय महामार्ग विभागाची परवानगी आहे का? अशी विचारणा केली.या कामाला परवानगीच नसल्याची बाब समोर आली. जाधव यांनी महामार्ग विभागाच्या शाखा अभियंत्याला भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून योजनेच्या कामाला मान्यता आहे काय अशी विचारणा करून पाईप लाईनचे काम सुरू असल्याची माहिती दिली. शाखा अभियंत्याने कामावर उपस्थित कंपनीच्या अभियंत्याला काम थांबविण्याचे आदेश दिले असल्याचे जाधव यांनी सांगितले.
        तूर्तास पाईप लाईनचे काम थांबले असून परवानगी न घेताच काम सुरू केल्यास शिवसेनेकडून आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी सदरील कामास कायमची स्थगिती देऊन कंधार तालुक्यातील शेतकरी व जनतेवर होणारा अन्याय नाही थांबविल्यास शिवसेनेच्यावतीने जन आंदोलन उभे करणार असल्याचे तालुकाप्रमुख जाधव यांनी सांगितले.

धरण उशाला अन् फायदा तिसऱ्याला..?
 लिंबोटी धरण, मानार धरण हे कंधारकरांच्या उशाला असताना तालुक्यातील जनतेला मुबलक पाणी मिळत नाही. कंधार शहराला चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असून आणखी पावसाळ्यातही तालुक्यातील गावांमध्ये टॅंकर चालू आहेत. या धरणाचा फायदा दुसऱ्या तालुक्याला आणि जिल्ह्याला मिळत असल्याने कंधार- लोहा तालुक्यातील जनतेत संतापाची लाट पसरली आहे. एकीकडे विकासाच्या वल्गना करायच्या आणि दुसरीकडे आपल्या तालुक्यातून दुसऱ्या जिल्ह्यात पाणी जाऊ द्यायचे, हा कोणता विकास? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List