पायाकडे हात जातील असे गुरू हवेत..

पायाकडे हात जातील असे गुरू हवेत..

पायाकडे हात जातील असे गुरुजी आज हवे आहेत..तशी परिस्थिती आज राहिली नाही..शिक्षक विद्यार्थी नाते संपुष्टात येवू पाहत आहे..माझी शाळा,त्याकाळचे गुरुजी आज सगळे बदलले आहे..मला माझे लहानपण आजही लख्ख आठवते..धावपळ करत गाठलेली प्रतिज्ञा,हातावर खाल्लेले छडीचे मार..छताला दोरी बांधून घोड्यावर घालून खालून रुळाने मार..दोन बोटात पेन्सिल ठेऊन अभ्यास नाही झाल्यास गुरुजींनी केलेली शिक्षा..वर्गाच्या बाहेर केलेला कोंबडा,उजळणी पाठ… Continue reading पायाकडे हात जातील असे गुरू हवेत..

पायाकडे हात जातील असे गुरुजी आज हवे आहेत..तशी परिस्थिती आज राहिली नाही..शिक्षक विद्यार्थी नाते संपुष्टात येवू पाहत आहे..माझी शाळा,त्याकाळचे गुरुजी आज सगळे बदलले आहे..मला माझे लहानपण आजही लख्ख आठवते..धावपळ करत गाठलेली प्रतिज्ञा,हातावर खाल्लेले छडीचे मार..छताला दोरी बांधून घोड्यावर घालून खालून रुळाने मार..दोन बोटात पेन्सिल ठेऊन अभ्यास नाही झाल्यास गुरुजींनी केलेली शिक्षा..वर्गाच्या बाहेर केलेला कोंबडा,उजळणी पाठ नाही झाली तर बेंचवर उभा करून दिलेले फटके,आगाऊपणा केला तर शाळेत गुरुजींचा मार आणि घरी आल्यावर आईचे फटके..सगळे सगळे आज आठवत आहे.गुरू शिष्य परंपरा असायला हवी..एक बंधन असायला हवे..कुणाचा तरी धाक असल्याशिवाय आपल्यात बदल होत नाहीत..हल्ली छडी संपुष्टात आली..मारणारे शिक्षक संपले..जे मारतात त्यांनाच पालक भांडायला जातात आणि शाळेत धिंगाणा करतात..आम्ही डबल मार खायचो..
माझी शाळा ज्या शिक्षकाने बांधली,ते नणंदकर गुरुजी आजही गावकऱ्यांच्या लक्षात आहेत.उंचे पुरे,लोकमान्य टिळक यांच्यासारखे धिप्पाड आणि मिशाही तशाच..सगळे गाव विरोधात गेले सर थांबले नाहीत,त्यांनी डोक्यावर दगड आणून शाळेची इमारत बांधली,पुन्हा सगळे गाव कामाला लागले..इतका भूकंप झाला आजही माझी शाळा त्याच ताठ मानेने उभी आहे.असे शिक्षक आता राहिले नाही..गाव जवळ करणारे,शाळा सोडून शेताकडे लक्ष देणाऱ्या शिक्षकामुळे मूल्ये संपत चालली आहेत..माझे जोशी नावाचे शिक्षक असेच होते..हातात सापडेल ते घेवून गावभर फिरायचे,मुलगा बाहेर हुंदडताना दिसला की घरी मारत घेवून जायचे..माझी गावातली स्कॉलरशिप परीक्षा आजही आठवते.जोशी सरानी माझे कुलकर्णीचे जेवरीकर नामकरण केले..मी स्कॉलरशिपचा अभ्यास करत नव्हतो..एकेदिवशी बोलावून घेवून.विचारणा सुरू झाली..मी काही बोललो नाही,सर उद्यापासून अभ्यास करतो इतकेच म्हटले..तो दिवस आजही आठवतो.पंधरा मिनिटे घोड्यावर घालून खालून छडीने मारायला सुरुवात केली..मी पहिले ते दहावी वर्गात पहिला असणारा विद्यार्थी..मात्र खोडकर असल्याने मार खावा लागायचा..जोशी सर मला खूप वर्षांनी औरंगाबादला भेटले ..मी आणि मंजुषा दोघेही सत्कार करण्यासाठी गेलो,त्यांच्या डोळ्यातील पाणी पाहून मी कृतकृत झालो..अशी माणसे आज राहिली नाहीत..माझी समस्त शिक्षकांना विनंती आहे,आपल्या पायाकडे जेव्हा विद्यार्थ्याचे हात आपोआप वळतील त्यादिवशी तुम्ही धन्य झालात..ही जादू तयार करता आली पाहिजे..पगारापुरती नोकरी न करता वाहून घेऊन काम करणारी शिक्षकाची पिढी आज गरजेची आहे..आणि तसे पालकही..आम्ही झाडाखाली बसून शिकलो,आज सगळे जग विद्यार्थ्यांच्या हातात आहे..गुगल नावाच्या app ने तुम्हाला सगळी सारे उघडी करून दिली आहेत..फक्त गरज आहे संस्काराची..एका प्रामाणिक शिक्षकाची..विद्यार्थ्याला आपला विद्यार्थी समजून घडवण्याची..

जेव्हा आपल्या पायाकडे आमचे हात आपोआप जातील तेव्हाच तुम्ही आदर्श शिक्षक..स्पर्धेच्या जगात,वशिले लावून आदर्श शिक्षक पुरस्कार घेणारे अनेक शिक्षक मी पाहतो..ती लाचारी बंद व्हायला हवी..गुरुजीपेक्षा कोणीही मोठा नाही..गुरू शिवाय ज्ञान व्यर्थ..मात्र तसा एक तरी गुरू आयुष्यात यावा आणि आयुष्य आनंदी व्हावे…

समस्त गुरुजींना,ज्यांनी मला घडवलं,बिघडवल त्या सर्वांना आजच्या दिवशी मनपूर्वक शुभेच्छा…

 

@ संजय जेवरीकर
पत्रकार

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List