शरद पवारांनी घेतली 'ही' भीष्म प्रतिज्ञा ! काहीही झालं तरी.....

शरद पवारांनी घेतली 'ही' भीष्म प्रतिज्ञा ! काहीही झालं तरी.....

आधुनिक केसरी न्यूज 

पुणे  : आपल्या बारामतीत बदल होतोय तो आणखी चांगला करण्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याची भूमिका सर्वजण मिळून करू.  तुमची एकजूट कायम ठेवा. तीन- चार महिन्यांनी महाराष्ट्राची निवडणूक येणार आहे. माझा प्रयत्न हा आहे की, काहीही झालं तरी महाराष्ट्राचं राज्य हातात घ्यायचं ते घ्यायचं असेल तर विधानसभा जिंकावी लागेल असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी बारामती येथील शिर्सुफळ गावच्या गावकऱ्यांशी संवाद साधताना म्हटले आहे.

शरद पवार साहेब म्हणाले की,राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करू. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरु, तरीदेखील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही तर चार महिन्यानंतर बघू ४ महिन्यानंतर राज्यात विधानसभेचे निवडणुका होणार आहे. निवडणुकीनंतर सत्ता बदलणार आहे असे शरद पवार साहेब म्हणाले.

शरद पवार साहेब म्हणाले की, काही लोकांना वाटते की बारामतीत चमत्कार झाला. परंतु एवढी चर्चा व्हायचे कारण नाही, बारामतीच्या निवडणुकीची चर्चा होण्याचे खरे कारण म्हणजे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. कारण त्यांनी या निवडणुकीत लक्ष घातले होते, निवडणुकीत ज्या गोष्टी मांडायच्या नसतात, बोलायच्या नसतात त्या त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवल्या. त्यामुळेच या सगळ्या गोष्टींची अधिक चर्चा झाली असे शरद पवार साहेब यांनी म्हटले आहे.

पुढे शरद पवार साहेब म्हणाले की, बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी लोक फार काही बोलत नव्हते. त्यांनी नको त्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवले. पण मतदानाच्या वेळी इथले एकही गाव मागे राहिले नाही. त्यांनी शांतपणे बटण दाबले. तरुण मंडळींनी व वडीलधाऱ्यांनी ही निवडणूक हातात घेतली व त्यांनीच हा निकाल दिला, त्यामध्ये तुम्हा सगळ्यांचे योगदान हे मोठे आहे. असेही पवार साहेब म्हणाले.

शरद पवार साहेब म्हणाले की, आता जी निवेदनं मला दिली, त्यातील प्रत्येकजण हेच सांगत होता की, याचा मी नातू, त्याचा मी नातू म्हणजे आमच्या आजूबाजूची पिढी संपलेली आहे असं दिसतं, नवी पिढी आली, राहणीमानात बदल झाला आहे. बारामती तालुक्यातील जिन्हाईत भागाचा गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याच्या संबंधित आहे. जुन्या लोकांना आठवत असेल, आम्ही १९६६-६७ च्या वेळेला एका संस्थेकडून गहू घेतला होता आणि लोकांना गहू द्यायचो मजुरी म्हणून आणि लोक काम करायचे. त्यामुळे छोटे- मोठे तलाव या भागात झाले. बारामतीत अनेक कंपन्या आणल्या, एकाचं नाव डायनॅमिक्स, दुसरीचं नाव फरेरो. तिथे दुधाच्या पावडरपासून चॉकलेट तयार करतात. या कंपन्या जगातील मोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या दुधाची गरज १२ लाख लिटर आहे. आता १२ लाख लिटर बारामती तालुका, इंदापूर तालुका, दौंड तालुका आणि करमाळा या भागातून आपण गोळा करतो, त्याच्यावर प्रक्रिया करतो आणि कारखानदारी चालवतो. मी आता येताना बघत होतो प्रत्येकाच्या घराबाहेर गाय दिसली म्हणजे दुधाचा धंदा हा दोन पैसे वाढवणारा दिसतोय. असे शरद पवार साहेब  यांनी सांगितले.

यावर सविस्तर बोलताना शरद पवार साहेब म्हणाले की, साधारणतः ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या केल्या. शिक्षणाचं काम सांगितलं, इथेही शिक्षण संस्था आली याची कल्पना आहे, बारामतीला शिक्षण देण्याची व्यवस्था केली. मी पहिल्यांदा आमदार झालो, त्यावेळेला बारामतीला कॉलेज नव्हतं, इथल्या लोकांना पुण्याला जावं लागायचं. माझं स्वतःचं शिक्षण पुण्याला झालं. नंतर त्याच्यात लक्ष घातलं आणि आज विद्या प्रतिष्ठान असो ज्यात ३१ हजार मुलं-मुली शिकतात. माळेगावची शिक्षण संस्था असो तिथे काही हजार शिकतात. आज बारामतीमध्ये वरचं शिक्षण घेणारे ४८ हजार मुलं-मुली आहेत. असे शरद पवार साहेब यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

शरद पवार साहेब म्हणाले की, चांगले लोक आपण महाराष्ट्रात आणू आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे राज्य हातामध्ये आणू. हे काही अशक्य नाही तुम्ही लोकांनी मला चार वेळा निवडून दिलं चार वेळा मुख्यमंत्री ,दहा वेळा शेती मंत्री, दोन वेळा संरक्षण खात्याचा मंत्री या सगळ्या गोष्टी तुम्ही लोकांच्या सामूहिक शक्तीने घडू शकतात. मी आजवर अनेक निवडणुका लढलो आहे. खरंतर मी किती निवडणुका लढलो हे मला आठवतही नाही. सुरुवातीच्या काळात मी मते मागण्यासाठी तुमच्याकडे आलो. मात्र नंतरच्या काळात मी फक्त कामातून तुमच्या संपर्कात राहिलो. मी मते मागायला आलो नाही. परंतु, तुम्ही मतदान कधी चुकवले नाही. तुम्ही तुमचे काम चोख करत आला आहात. अजूनही करत आहात. परंतु, या वेळच्या निवडणुकीत परिस्थिती थोडी वेगळी होती. त्या परिस्थितीही तुम्ही माझ्या अपेक्षेप्रमाणे मतदान केले. असेही शरद पवार साहेब म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, देशाच्या दृष्टीने महत्त्वाची निवडणूक होती. आम्ही आघाडी म्हणून लढलो. राज्यात ४८ जागांपैकी ३० जागा जिंकल्या. एनसीपीने मुद्दाम कमी जागा लढण्याचा निर्णय घेतला. १० जागा घेतल्या ८ जिंकल्या. त्यात तुमचा वाटा होता. बारामती निवडणूक देशात गाजली. निवडणूक काळात सगळे लोकं काम करत होते. पण काही गावातील लोकं दडपण असल्यासारखे वागत होते ते पुढे येत नव्हते. काही लोकं सुरुवातीला सोबत आले आणि परत गायब झाले. या निवडणूकीत अनेक जण दिसले नाहीय. लोक मनात असेल ते करतात, दाखवत नाहीत. शांतपणे तुम्ही बटण दाबले. बारामती तालुक्याने सर्वात जास्त मतदान दिलं. त्यामुळे तुमचे आभार. असेही शरद पवार साहेब यांनी म्हटले आहे.

शरद पवार म्हणाले की, जगभरातील अनेकांचे लक्ष बारामतीकडे लागले होते. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातला एक भाग आहे, जिथे जगभर काय काय चालले आहे त्याचे पोस्टर किंवा बोर्ड लावले जातात. तिथल्या एका बोर्डवर बारामतीच्या निवडणुकीची माहिती होती. म्हणजे बघा बारामती कुठपर्यंत पोहोचली आहे. अगदी न्यूयॉर्कपर्यंत तुम्ही पोहोचला आहात. याचा अर्थ लोकांचे निवडणुकीकडे लक्ष होते आणि त्याचा परिणाम निकालातून दिसून आला. असेही पवार साहेब म्हणाले.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List