राजुर येथील दुर्दैवी घटना: पाण्यातून विषबाधा होऊन 86 मेंढ्यांचा मृत्यू
सहा मेंढ्यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश मेंढपाळांवर कोसळला दुःखाचा डोंगर लाखोंचे नुकसान, त्यारात्री पालावर चूल पेटली नाही
आधुनिक केसरी न्यूज
प्रा बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजुर : रासायनिक खत व दूषित पाण्यातून विषबाधा होऊन 86 मेंढ्यांचा तडफडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भोकरदन तालुक्यातील राजूर येथील चांदई एक्को रोड परिसरात 26 ऑगस्टला सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे.यामुळे मेंढपाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून 12 लाखांच्यावर आर्थिक नुकसान झाले आहे. हा दिवस मेंढपाळांसाठी काळा दिवस ठरला असून यारात्री पालावर चूल पेटली नाही.या घटनेबद्दल परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मेंढपाळ बाळू शिंगाडे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी तालुक्यातील धनगर समाजातील संघटनांनी केली आहे.
सविस्तर माहिती अशी की नाशिक जिल्ह्यातील टाकळी (ता.नांदगाव) येथील मेंढपाळ बाळू शिंगाडे व त्यांचे बंधू भावराव शिंगाडे हे राजूर येथील चांदई एक्को रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत मेंढ्या चारत होते.दरम्यान मेंढ्यांनी खोलगट स्थळी साचलेले रासायनिक खताचे विषारी पाणी पिल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अवघ्या 15 ते 20 मिनिटात मेंढ्या चक्कर येऊन पडायला सुरुवात झाली.या दुर्दैवी घटनेत 86 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे.
यांनी दिली घटनास्थळी भेट
विषबाधा होऊन मेंढ्यांच्या मृत्यू झाल्याची घटना कळताच राजुरच्या सरपंच प्रतिभा भुजंग,माजी सरपंच भाऊसाहेब भुजंग,ग्रामविकास अधिकारी प्रमोद पुंगळे,ग्रामपंचायत सदस्य श्रीमंता बोर्डे,पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र वसमतकर,डॉ.रवींद्र जायभाये, डॉ. वाघमारे तलाठी अरुण पवार, विजय गरड यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन मेंढपाळ कुटुंबियांना धीर देऊन सांत्वन करून सर्वतोपरी सहकार्य केले.
माजी केंद्रीयमंत्री दानवेंचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन
राजूरचे माजी सरपंच भाऊसाहेब भुजंग यांनी फोनवरून घडलेल्या घटनेची माहिती माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांना दिली.माहिती मिळताच मा.मंत्री दानवे यांनी जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्याशी फोनवरून संवाद साधून मेंढपाळ कुटुंबास शासनस्तरावर
सर्वोतोपरी मदत करण्याचे सांगितले.
86 मेंढ्यांचा मृत्यू आणि 12 लाखांच्यावर नुकसान
मेंढपाळ बाळू शिंगाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार कळपात एकूण 200 मेंढ्या होत्या.त्यापैकी खाली 51तर गाभण 35 अशा एकूण 86 मेंढ्यांचा मृत्यू झाला. त्यात काही मेंढ्यांची कोकरांचाही समावेश आहे.खाली 51मेंढ्यांची किंमत पाच लाख तर 35 गाभार मेंढ्यांची किंमत सात लाखअसे एकूण 12 लाखांच्यावर नुकसान झाल्याचे शिंगाडे यांनी सांगितले.
सहा मेंढ्यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश
विषबाधा होऊन मेंढ्या चक्कर येऊन जमिनीवर कोसळत होत्या.घटनेची माहिती मिळताच राजूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र वसमतकर, डॉ. रवींद्र जायभाये डॉ. वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन बाधित मेंढ्यांवर तातडीने उपचार करायला सुरुवात केली. त्यामधील सहा मेंढ्यांना डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे जीवदान मिळाले.
शासनाकडून आर्थिक मदत मिळावी
विषबाधा होऊन मृत्यू झालेल्या मेंढ्यामुळे कुटूंबावर आघात होऊन लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे.ही हानी भरून निघणारी नाही.परंतु शासनाने या दुर्दैवी घटनेची दखल घेत मेंढपाळांच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी भोकरदन तालुक्यातील धनगर समाज व संघटनांनी केली आहे.
कर्ज काढून घेतल्या होत्या मेंढ्या
मेंढपाळ बाळू शिंगाडे व त्यांचे बंधू भावराव शिंगाडे सांगत होते की आम्ही याचवर्षी बाहेरील लोकांचे कर्ज काढून व नातेवाईकांकडून पैसे जमा करून मेंढ्या विकत घेतल्या होत्या.आमचा समाज भटकंती करणारा आहे. निरक्षर व भूमिहीन आहे.काढलेले कर्ज कसे फेडावे हा गंभीर प्रश्न आमच्या समोर आहे.
त्यारात्री पालावर चूल पेटली नाही
लेकरांप्रमाणे जीवापाड सांभाळलेल्या मेंढ्या तडपतांना व मृत्युमुखी पडतांना आम्ही आमच्या डोळ्यांनी पहात होतो परंतु काही करू शकलो नाही.जीवाची काहिली झाली होती.लहान मुलं,महिला एकसारखे रडत आहेत.मोठे बंधू भावराव शिंगाडे हे चक्कर येऊन पडले आहेत. संसाराची धूळधाण झाली आहे.आमच्यासाठी हा काळा दिवस होता. या दुर्दैवी घटनेमुळे त्यारात्री पालावर चूल पेटली नाही. हे सांगत असताना बाळू शिंगाडे यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
Comment List