शिक्षक संचमान्यतेचे नवे निकष ; २१ पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये चार वर्गापर्यंत राहणार एकच शिक्षक ; अनेक शिक्षकांवर गंडांतर येण्याची भीती ; शिक्षकांत नाराजीचे वातावरण
आधुनिक केसरी न्यूज
किरणकुमार आवारे
निफाड :- शालेय शिक्षण विभागाने २०२४-२५ साठी नवीन संच मान्यता निकष जाहीर केले आहेत. यापूर्वी १ ते ४ पर्यंतच्या शाळांना दोन शिक्षक मंजूर होते. मात्र, नवीन निकषानुसार २१ पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये चार वर्गापर्यंत एकच शिक्षक राहणार आहे. यामुळे दुर्गम भागातील, वाड्या वस्तीवरील शाळेतील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, विद्यार्थ्यांचेही नुकसान होणार असल्याने या निकषाबाबत शिक्षकांत नाराजीचे वातावरण आहे.
नवीन शिक्षक संचमान्यतेच्या निकषात शासनाने बदल करत २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांसाठी नियमित शिक्षकाचे एक पद मंजूर केले आहे. यामुळे राज्यात दुर्गम भागातील वाडीवस्तीवरील शाळेतील विद्यार्थ्यांना चार वर्गासाठी एक शिक्षक मिळणार आहे. यामुळे शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात अतिरिक्त ठरणार आहेत. दुर्गम वाडीवस्तीवरील शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना चार वर्गांना अध्यापन करत असताना सर्व प्रशासकीय कामकाजही करावे लागते. आजपर्यंत पटसंख्येच्या अटीशिवाय या शाळांमध्ये दोन शिक्षक पदे मंजूर असताना नवीन संचमान्यतेनुसार एक नियमित शिक्षक व दुसरा सेवानिवृत्त शिक्षक अशी पदे मंजूर केली आहेत. जे युवा शिक्षक दीर्घकाळ नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्या भविष्याचा विचारही करणे आवश्यक आहे. संचमान्यतेच्या नवीन निकषामुळे सन २०२४- २५ पासून शिक्षक संख्या मान्यतेचे प्रमाण खूप खाली येणार आहे. शिवाय, नव्या शिक्षक संच मान्यतेमध्ये बऱ्याच अटी व शर्तीही आहेत. या नव्याने आलेल्या अटी बदलण्यासाठी जुनी पेन्शन संघटनेकडून शासनाकडे मागणी करणार आहे.
● निकष काय आहेत ?
द्विशिक्षकी शाळांमध्ये ६० पटांसाठी किमान दोन शिक्षक आहेत. तिसरा शिक्षक पात्र होण्यासाठी किमान १६ मुलांची अधिक आवश्यकता, हे तीन शिक्षक टिकविण्यासाठी किमान ७६ मुले आवश्यक. पटसंख्या दहापर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असल्यास फक्त एक सेवानिवृत्त शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध नसल्यास नियमित शिक्षक मिळेल. इयत्ता सहावी ते आठवीमध्ये एकच वर्ग असल्यास ३५ पर्यंत एक शिक्षक आणि त्यापुढे ५३ पटानंतर दुसरा शिक्षक मान्य होणार. तिसऱ्या शिक्षकांसाठी किमान ८८ पटसंख्या लागणार आहे.
Comment List