इस्माइल : कालबाह्य शिक्षणपद्धतीचा बळी !

इस्माइल : कालबाह्य शिक्षणपद्धतीचा बळी !

विशेष संपादकीय…! एखादी गोष्ट आपण मनापासून केली तर ती मिळवून देण्यासाठी सर्व जग आपल्यासोबत असते, असे म्हणतात. तसेच उघड्या डोळ्यांनी पाहिलेली सारी स्वप्ने साकार होतात,

विशेष संपादकीय…!
डॉ. प्रभू गोरे, संपादक


एखादी गोष्ट आपण मनापासून केली तर ती मिळवून देण्यासाठी सर्व जग आपल्यासोबत असते, असे म्हणतात. तसेच उघड्या डोळ्यांनी पाहिलेली सारी स्वप्ने साकार होतात, असेही म्हणतात. पण इस्माइल या ध्येयवेड्या युवकाच्या बाबतीत कुठल्याही पुराणातल्या गोष्टी सत्यात उतरल्या नाहीत. दिल है छोटा सा। छोटी सी आशा। मस्ती भरे मन की। भोली सी आशा। चाँद तारों को। छूने की आशा। आसमानों में उड़ने की आशा।। असे म्हणत लहानपणापासून पाहिलेल्या स्वप्नाचा शेवट इस्माइलच्या मृत्यूने झाला आणि त्याचा तो शेवटचा लाइव्ह मृत्यूचा व्हिडीओ बघणाऱ्यांचे हृदय भरून आले. हा फक्त इस्माइलच्या आकाशस्वप्नांचा अंत नसून जे असे जगावेगळे करू शकतात पण त्यांना योग्य मार्गदर्शन, साधनसामुग्री मिळत नाही त्या सर्वांच्याच स्वप्नांचा अंत होय. फक्त आठवीपर्यंत शिकलेल्या इस्माइलने अतिशय कल्पकतेने आणि स्वबळावर हेलिकॉप्टर तयार केले होते. उद्या १५ ऑगस्टला ते हेलिकॉप्टर आकाशात उडवून आपल्या स्वप्नांना गवसणी घालू, असा निर्धार त्याने केला होता. परंतु चाचणीदरम्यान हेलिकॉप्टरचा पंखा तुटला आणि इस्माईलच्या आयुष्याचा दोरही त्या पंख्यासोबत तुटला. शेख इस्माइल पत्रे कारागीर असल्याने तो अलमारी, कूलर अशी विविध उपकरणे बनवायचा. एक दिवस त्याला हेलिकॉप्टर बनवण्याची कल्पना सुचली. आर्थिक परिस्थिती जेमतेम असली तरी त्याची स्वप्ने मोठी होती आणि ही स्वप्ने त्याला झोपू देत नव्हती. आपल्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी त्याने हेलिकॉप्टर तयार करण्यास सुरुवात केली. हेलिकॉप्टरसाठी लागणारा एक एक सुटा भाग तो तयार करीत होता. दोन वर्षांच्या कठोर मेहनतीतून अखेर हेलिकॉप्टर तयार झाले. मंगळवारी रात्री त्याने हेलिकॉप्टरची चाचणी घेण्यास सुरुवात केली. जमिनीवर इंजिन सुरू केले. इंजिन ७५० अ‍ॅम्पियरचे होते. चाचणी व्यवस्थित सुरू असताना अचानक हेलिकॉप्टरचा मागचा पंखा तुटला व तो मुख्य पंख्यावर धडकला आणि आकाशाला गवसणी घालण्याआधीच शेख इस्माइलचे डोळे मिटले. स्वदेशी हेलिकॉप्टर बनवण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या इस्माइलचे ग्रामस्थांकडून कौतुक होत होते. त्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर गावाचे नावही जगासमोर येईल, असे स्वप्न फुलसावंगीसह आजूबाजूच्या गावकऱ्यांचेही होते. इस्माइल प्रचंड ध्येयवेडा होता. पण त्याने जरा जास्तच घाई केली. उड्डाणाचे प्रात्यक्षिक घेण्यापूर्वी त्याने तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा होता. आता माहितीक्रांतीच्या युगात अशा गोष्टींसाठी घरबसल्या मार्गदर्शन मिळू शकले असते. एवढा हुशार इस्माइल इथं कसा काय चुकला, हा न सुटणारा गुंता आहे. इस्माइलसारखे लाखो युवक ग्रामीण भागात राहून अशी वेगवेगळी स्वप्ने साकार करण्यासाठी धडपड करत आहेत. त्यांच्याकडे प्रचंड कल्पकता आहे आणि ही कल्पकता सत्यात उतरवण्याची ऊर्जाही आहे. फक्त त्यांना योग्य मार्गदर्शन व पाठबळाची गरज आहे. शहरातच शिक्षणावर पाण्यासारखा पैसा खर्च करणाऱ्या सरकारने आणि इमारतीचे मजल्यावर मजले चढवणाऱ्या शिक्षणसम्राटांनी ग्रामीण भागाकडे थोडे लक्ष द्यावे. परंपरागत शिक्षणापेक्षा विद्यार्थ्यांचा कल ओळखून शिक्षण देण्याची खरी गरज आहे. फिनलँडमध्ये म्हणे मुलाला खुल्या शाळेत घातल्यावर वर्ष-दोन वर्षं काहीच शिकवत नाहीत. त्याला मोकळे खेळू-बागडू देतात आणि शिक्षक फक्त त्याचे निरीक्षण करतात. तो काय करतो? कुठल्या गोष्टीत त्याला जास्त आवड आहे. सतत सतत तो कुठल्या वस्तू हाताळतो. याचा अतिशय बारकाईने अभ्यास करून मग त्याला ज्या विषयात जास्त आवड आहे त्या विषयाचे शिक्षण दिले जाते. इस्माइल जर त्या देशात जन्मला असता तर आज त्याच्या घरी मातम नसून ईद असती आणि आम्ही त्याच्या मृत्यूवर नव्हे तर पराक्रमावर विशेष संपादकीय लिहिले असते. महासत्तेची स्वप्न पाहणाऱ्यांनी आता तरी याचा विचार करावा. इस्माइलचा मृत्यू अपघाती नसून तो आपल्या कालबाह्य शिक्षणपद्धतीने घेतलेला बळी आहे.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List