हातात संविधान अन् मनात विजयाचा विश्वास !
अंतिम आठवडा प्रस्तावावर जयंत पाटील यांचे जोरदार भाषण
आधुनिक केसरी न्यूज
मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशनाची आणि महायुती सरकारच्या शेवटच्या अधिवेशनात सांगता आज झाली. शेवटच्या दिवशी आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभागृहात जोरदार भाषण केले. आपल्या भाषणाच्या शेवटी संविधान उंचावत त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.
जयंत पाटील यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
- हा या अधिवेशनाचा अंतिम आठवडा नसून, या विधानसभेच्या कार्यकाळाचा अंतिम आठवडा आहे असे मी मानतो. लोकशाही मार्गाने आलेले सरकार पैशांच्या आणि सत्तेच्या जिवावर कसे बदलले जाऊ शकते, हे गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राने पाहिले.
- या सगळ्या कोलाहलात, कायदा आणि सुव्यवस्था गेल्या अडीच वर्षांत सर्वात खराब होती. आजच्या घडीला पोलिसांची कामे इतकी वाढली आहेत की पोलिसांचे जे मूळ काम आहे अपराध रोखणे हे काहीसे बाजूला पडले आहे. पोलिसांवरील ताण इतका वाढला आहे की, आज देशात पोलिसांच्या आत्महत्येत महाराष्ट्र पहिला आहे.
- सध्याच्या पोलिस महासंचालक महोदया यांनीच राज्यातील जनतेला असे म्हणतात की, “राज्यातील जनतेचा पोलिसांवरील विश्वास कमी होत/नष्ट होत चालला आहे आणि तो विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्याची गरज आहे.” हे अत्यंत गंभीर आहे.
खोट्या केसेस दाखल होण्याचे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यातून समाजाची Harassment होत आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड जिल्ह्यातील इंजेगाव येथे सत्ताधारी पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी बुथ ताब्यात घेऊन मयत व्यक्तींच्या नावे बोगस मतदान केले. हा प्रकार उघडकीस आणणाऱ्याच्या कुटुंबीयांना सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून व पदाधिकाऱ्यांकडून धमकवण्यात आले. पीडिताचा गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. बीड जिल्ह्यातील देवस्थान जमिनी हडपण्याचा प्रकार झाला होता. एक कार्यक्षम पोलीस अधिकारी तेथे तपास करत असताना, त्यांची बदली केली जाते.
- सरकार नसून बिल्डर आणि कंत्राटदारांचे सरकार आहे. एमएसआरडीसीने विविध एक्सप्रेस वेची कामे काढली आहेत. या कामांमध्ये एमएसआरडीसीने नवयुग कन्स्ट्रक्शन आणि मेघा इंजीनियरिंग या कंपनींना नुसती खैरात वाटली आहे. या दोन्ही कंपन्यांना कंत्राटाच्या रक्कमे पेक्षा ३० ते ४० टक्के वाढीव रक्कमेने काम दिले आहे.
- उपमुख्यमंत्र्यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेला शक्तिपीठ महामार्ग १२ जिल्ह्यातून जाणारा महामार्ग आहे. त्यामुळे तेथील शेतकर्यांची २७ हजार एकर जमीन भुसंपादन केली जाणार आहे. अनेक शेतकरी भूमीहीन होणार आहेत. या महामार्गामुळे आमच्या सांगली जिल्ह्य़ातील शहरी आणि ग्रामीण भागातील गावांना महापुराचा धोका मोठ्या प्रमाणात उद्भवणार आहे. हा मार्ग रद्द व्हावा ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची भावना आहे. आमचा डेव्हलपमेंटला विरोध नाही पण डेव्हलपमेंटच्या नावाखाली लोकांचा हक्क हिरावून घेणे हे लोकशाहीचे लक्षण नाही.
- या सरकारच्या काळात पेपरफुटीचे स्तोम माजले आहे. तरुणांचे भवितव्य अंधारात आहे. मात्र सरकार यावर कारवाई करण्याऐवजी विरोधक नरेटीव्ह सेट करत आहे असा आरोप करते.
- राज्यातील गरीब महिला भगिनींनी गुंतवलेल्या पैशांना गंडा घालून ‘मैत्रेय प्राव्हेट लिमिटेड’ या कंपनीने प्रचंड माया जमवली. मैत्रेयच्या प्रॉपर्टीज शासनाकडे जप्त आहेत, त्या विकून महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा.
- या सरकारचा भ्रष्ट कारभार कारागृहातही पोहोचला आहे. कारागृहाच्या उपहारगृहात लागणाऱ्या वस्तू अत्यंत चढ्या भावाने घेतल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यासाठी कोणतीही निविदा काढली जात नाही आणि एकाच कंत्राटदाराला हे काम दिले जात आहे. या भ्रष्टाचारात शासनाने लक्ष घातले पाहिजे.
- सरकारची सुडबुद्धीची कारवाई काही केल्या थांबत नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नांदगाव तालुकाध्यक्षावर खोटी केस दाखल करून त्याला अडकवण्याचा प्रकार घडला आहे. पानपट्टी चालवणाऱ्या एका सामान्य माणसाला या सरकारच्या काळात त्रास दिला जात आहे.
- आगामी विधानसभा निवडणुकीत जनता या सगळ्या गोष्टींचा निकाल लावेल.
- जनतेच्या मुक्तीसाठी अजून एक समर आहे, आणि जिचा आत्मा एक, ती जनता अमर आहे.. !!!
जनतेच्या मुक्तीचे समर आम्ही येत्या विधानसभा निवडणुकीत लढू आणि जनतेचा आशीर्वादाने पुन्हा सभगृहात येऊ.
Comment List